Skip to main content

मंगळागौर...(भाग १)

"नाही गं येणं नाही होणार माझं मंगळागौरीला..हो इथेच करेन सगळी पुजा व्यवस्थित तू फक्त मला पुस्तक पाठव" असं म्हणून मी फोन ठेवला.

मंगळागौर..लग्नं झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी करायची पुजा. पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पुजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून, खेळ खेळून जागरणं करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची ;).

लहानपणापासून ऐकत होते, श्रावण सुरू झाला की कोण्या अमुक अमुक ची मंगळागौर झाली वगैरे. मलाही फार इच्छा होती की मस्तं थाटात साजरी करावी पहिली मंगळागौर माहेरी. पण सुट्ट्या आणि आरक्षण या दोन्ही बाबी आड येत असल्याने माझं जाणं होणारच नाही अशी मला खात्री झाली..शेवटी तो माझा सण आहे आणि मला साजरा करायलाच हवा असे मानून मी कंबर कसली..

मला खरंच भारताबाहेर राहणाऱ्यांचं अमाप कौतुक वाटतं.मी भारतातच एका वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या राज्यात राहूनंही मला माझं गाव, तिथली लोकं, बाजारात मिळणाऱ्या गोष्टी इतक्या आठवतात.तर ही सगळी बाहेर राहणारी मंडळी भारताला किती मिस करत असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही.

एक तर तमिळ कुटुंबात असल्याने मला त्यांना मंगळागौर म्हणजे काय हे समजावून सांगणे हे अतिशय कठिण होते (अशीच काहीशी परिस्थिती गुरुपौर्णिमेला, त्यादिवशी सासरा आणि सून यांनी एका छताखाली वावरू नये असे म्हणतात आता हे ही भाषा येत नसताना समजवून सांगणे म्हणजे माझ्या पेशन्स ची सत्त्वपरीक्षा..नशिबाने आम्ही माहेरीच होतो त्यादिवशी) तरीही हिंमत करून, नवऱ्याच्या भाषांतराची मदत घेऊन मी घरी पुजा करणार आहे असे सांगितले. घरातली मंडळी एकदम कूल असल्याने तसा फारसा फरक पडला नाही.

इकडे पूजा करायची म्हणजे देवाला अंघॊळ, वस्त्र घालून, चंदन, फुले वाहून, हातात घंटा घेऊन सरळ कापूर आरती ओवाळणे, मला तर आरत्या म्हटल्याशिवाय पूजा झाल्यासारखी वाटतंच नाही :( इकडचा झाल्यापासून माझा बाळकृष्णही कापूर आरतीवरच समाधान मानत असला पाहिजे.

करता करता शनिवार येऊन ठेपला आणि अजूनही मला मंगळागौरी व्रतकथा चं पुस्तक आलं नव्हतं, पुजा होती अवघ्या तीन दिवसांच्या अंतरावर. मग काय महाजालावर गुगललं आणि मिळालं मंगळागौरी व्रतकथा चं पुस्तक.ज्या कुण्या भल्या व्यक्तीने हे पुण्याचं काम केलंय त्याला शतशः: नमन करून मी त्यात डोकावायला सुरुवात केली...पहिले प्रिंट आऊट्स काढून घेतले. पूजेचा विधी काय किंवा नवीन तमिळ पाककृती काय, लग्नं झाल्यापासून महाजाल हे माझं रेडी रेफ़रंसिंग चं एक माध्यम आहे. त्याला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच!!

पुस्तक तर मिळालं पण त्यात दिलेली वस्तूंची यादी पहिले आणणं आवश्यक होतं. भाषा येत नसल्याने दुकानात जाऊन "सुपारी द्या हो" हे कसं म्हणायचं हा एक मोठा प्रश्न होता. खारका, बदामा, हळकुंडं यांचं ठीक आहे पण अष्टगंध, गुलाल आणि बुक्का कुठून आणि कसा जमवायचा हा तर विचारच होता. बरं सांगितलं तरी कुणाला कळेना. इथे हळद कुंकू वगैरे मिळतं पण गुलालाची एकदा चौकशी केली तर काही ही हाती लागलं नाही असा माझा पूर्वानुभव होता त्यामुळे यादीतून गुलाल बुक्का तात्पुरता वगळला.

पुढच्या पानावर काही निवडक फुलांच्या, फळांच्या झाडांची १६ १६पाने म्हणजे पत्र्या गोळा करायला सांगितल्या होत्या. फुला फळांचं एकवेळ ठीक आहे पण आघाडा, केना आठवून तर मला हसायलाच आले. कुणाला सांगू आणि काय नावं सांगू :). लहानपणी हरितालिकेला मी सगळ्या पत्र्या गोळा करून घरी घेऊन जायची. काय मजा यायची म्हणून सांगू? मी आणि माझी मावशी एक टोपली आणि त्यात सुई दोरा घेऊन निघायचो आदल्या दिवशी. लागणाऱ्या सगळ्या पत्र्या गोळा करून मगच घरी यायचो..त्यावेळी आघाड्याची पानं खूप शोधावी लागायची. एवढ्या दुर्मिळ पत्र्याच देवाला का आवडतात असं मला नेहमी वाटायचं. इथे तर आघाडा वगैरे मिळायची शक्यताच नव्हती.

१५ पदार्थांची यादी आता अगदी ७ वर येऊन ठेपली होती. हे पदार्थ कमी होत होत माझी पुजा "दोन हस्तक तिसरे मस्तक" वरच होते की काय असे वाटायला लागले होते.

वायनाचे पदार्थ मला तसे नवीन नव्हते. चोळी गरसोळीची मला हरितालिकेमुळे सवय होती. आता ती इथे लोकेट कशी करायची हा विचार करत करत माझी इथल्याच एका बाजारात भटकंती चालली होती. आजूबाजूचे मोगऱ्याच्या गजऱ्यांचे ढीग पाहून माझा बाळकृष्ण केवळ या फुलांमुळेच आनंदी असावा असं वाटून गेलं..

बरंचंसं पूजेचं साहित्य असणाऱ्या एका दुकानात मला कापसाच्या माळा आढळल्या आणि हायसं वाटलं. तिथनंच जानवं घेतलं, कापूर, वाती घेतल्या तेवढ्यात तुझ्यासाठी पुस्तकासहीत सगळं पूजेचं साहित्य ओळखीच्या काकांबरोबर चेन्नईला पाठवलं आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. असा बाबांचा फोन आला.

आता फक्त वाट आहे ती मंगळवारची..:)

क्रमशः

Comments

  1. गुड. :) डौलाने करा पुजा अन लिहा पुढचा भाग. शुभेच्छा.. :)

    ReplyDelete
  2. blog la bhet dilyabaddal dhanyavad shreya.
    mangalwari puja aahe. mala tar sagali gammatach watatey..
    baghuya kaay hotay te.
    pratisaadasathi manapasun aabhar!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक