Skip to main content

माय मराठी!!

मराठी ही अतिशय हळवी भाषा आहे असं मला नेहमी वाटतं (शिव्या जरी लक्षात घेतल्या तरी). माझ्या आणि कितीतरी हळव्या मराठमोळ्या मनांच्या व्यथा तिने आजवर व्यक्त करण्यास हातभार लावला आहे.

पहीला शब्द मी बोललेला "आदा" (आई) हा होता असं आई म्हणायची...मला हिन्दीतल्या मा, ईंग्रजीतल्या मम्मी..तमिळमधल्या अम्मा..पेक्षा आई हा शब्दच अधिक श्रवणीय वाटतो.आई नंतर बाबा..मामा, आजोबा,आजी..मावशी, काका आणि नंतर व्यवहारीक शब्दं अशी माझी मराठीतील वाटचाल सुरु झाली.

भाषा म्हंटलं की समाजातील प्रत्येक थरातील व्यक्तीचा तिच्यावर प्रभाव पडत असतो.भंडार्यात एका वेगळ्याच प्रकारे मराठी बोलली जाते त्यात हिन्दी तील काही शब्दही वापरले जातात.मी जास्तं काही सांगायला नकोच याबद्दल.पु.लं नी आधिच लिहुन ठेवलेलं आहे.लहानपणी भंडारा, नागपूर ला असल्यामुळे विदर्भातील मराठी भाषाच कानावर पडली.बरेचशे शब्द अजुनही ऐकले की त्याच लहानपणीच्या दिवसांची आठ्वण होते.ही वर्हाडी भाषा बोलण्यात मात्र एक वेगळीच मजा आहे.मी नागपुरला गेले की हमखास "का गं?" च्या ऐवजी " काऊन गं?", " कुठे जातोयस?" च्या ऐवजी"कुठे जाऊन राहीला?" असंच बोलते.वर्हाडी शब्दांची एक स्वतंत्र डिक्शनरी असावी असं मला वाटतं.नाहीतर हे शब्द असेच लोप पावतील..

माझी आई विदर्भातली आणि बाबा मराठ्वाड्याचे असल्याने दोघांचीही बोलीभाषा वेगळी होती.खुप गोड आहे मराठ्वाडी मराठी.मराठ्वाड्यातील काही शब्द मला फ़ार आवडतात. उदा. माय, लेकरु,...आई एखाद्या वेळेला रागावली की बाबा लगेच म्हणत "जाऊ दे लेकरु आहे"..त्यांची माझ्यावरची माया लेकरु या शब्दात एकवटली आहे असे मला वाटे.अजुनही ते कुठे गेली होतीस? असं नं विचारता कुठे गेली होती माय? असं विचारतात. बाबांकडले कुठ्लेही नातेवाईक माय या संबोधनाशिवाय मुलीबाळींना कधीच बोलवत नसावेत.आणि ह्या भाषेचा सगळा गोडवा अश्या शब्दातच आहे...

खान्देशातील मराठीचा आणि माझा फ़ारसा संबंध आला नाही...पुण्याला आल्यावर मात्र थोडीशी सावरुन मराठी बोलायला शिकले..आईशप्पथ!! ;) नाहीतर आम्हा वर्हाडी मानसाले मले तुले ची सवय;)

लहानपणापासुन माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठी भाषिकांचा फ़ार कमी वावर होता.माझ्या बहीणिच्या मित्रमंडळात सगळे जोशी, देशपांडॆ, कुलकर्णी, पाटील असे लोक आणि माझ्या सगळ्या मैत्रिणि म्हणजे खान, पुरी, फ़्रांसिस वगैरे नावाच्या त्यामुळे मराठी भाषिक मित्रमंडळाला मी मुकले असं मला वाटायचं...

कहर म्हणजे पुण्यात शिकायला असतांनाही माझा एकही मित्र किंवा मैत्रिण मराठी नव्हते...तिथे असतांना अस्सल मराठी जेवणाच्या ऐवजी माझ्या दक्षिण भारतातील मित्रांच्या कृपेने मी भरपुर रसम भात चोपला आहे...:) माझी ही हळहळ जाणुनच कदाचित देवाने मला कामानिमित्त मुंबईला(ठाण्याला) पाठ्वले जिथे माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठमोळ्या लोकांची भर व्हायला लागली...आणि मी एकदाचा निश्वास सोडला... दीड वर्षांच्या माझ्या ठाण्यातील वास्तव्यात मला खुप मराठी पुस्तके वाचता आली...मराठी नाटके, गाण्यांच्या महफ़िली अनुभवायची संधी मिळाली...

मुंबईत वावरतांना आणि तिथली टपोरी भाषा वापरतांना मराठीच्या मोठेपणाची दाद द्यावी शी वाटली..इतक्या वर्षापासुन, हजारो बोलीभाषांचा प्रभाव पडुन सुध्दा आपली माय मराठी तितकीच हळवी...तितकीच उदात्त वाटते...ह्यालाच भाषेचं सामर्थ्य म्हंटले असावे नाही का?

आणि म्हणुनच आपण मराठीला माय मराठी म्हणत असु...

Comments

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...