Skip to main content

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - सुंडल



चेन्नई तिरुचिरापल्ली हायवे वर ९९ नावाचे एक हॉटेल आहे.परवा दिंटिकल ला जातांना तिथे थांबलो. ऐन छोट्या भुकेची वेळ. कॉफी पण प्यायची होती. नेहेमी ग्रँड स्वीट्स किंवा अड्यार आनंद भवन मध्ये मिळणारी खाण्याची वस्तू, अशी हायवे वरच्या हॉटेलात मिळेल असे वाटलेही नव्हते. पण मस्तपैकी शेंगदाण्याचे सुंडल (साधेच), केळफुलाचे वडे, आणि कॉफी चा आस्वाद घेतला. 
वेरकडलाई सुंडल 

सुंडल हा प्रकार अतिशय सोपा, वेळेनुरूप आहे असे मला नेहेमी वाटते. ४-५ वाजता पोटात कावळे ओरडायला लागतात, तेव्हा अगदी खूप जास्त नाही आणि कमीही नाही असे "काहीतरी" खायला हवे असते. असेच काहीतरी म्हणजे सुंडल.
चणे, शेंगदाणे, चवळी, हिरवे मूग, राजमा, कुळीथ असे कुठलेही कडधान्य सुंडल मध्ये वापरता येते. अगदी साधी सोपी पद्धत आहे सुंडल करण्याची, लक्षात ठेवून कुठलेही कडधान्य आदल्या रात्री भिजत घालावीत, सकाळी त्यातून पाणी निथळू द्यावे , एका सुती कापडात बांधून ठेवावे. मूग, मोट आणि मोड येणारी कडधान्ये थोडी एक दिवस जास्त बांधून ठेवायला लागतात. पण काळे चणे, काबुली चणे, राजमा, चवळी, शेंगदाणे वगैरे ला रात्री भिजवून छानपैकी उकळून घेतले की ही मंडळी सुंडल साठी सज्ज असते. बहुतेक दाक्षिणात्य पदार्थांची पूर्व तयारी करावी लागते, त्यात सुंडल चा पण अपवाद नाही. 
केळफुलाचे वडे, सुंडल आणि फिल्टर कापी 
उकळून घेतल्यावर पाणी निथळले की एका कढईत तेलाची फोडणी करावी, त्यात मोहरी, चण्याची डाळ, आणि उडीद डाळ एक चमचाभर घालावी. मोहरीची तडतड झाली, की लाल मिरची आणि हिंग टाकावा, हळद थोडीशी टाकावी आणि वरून मस्तपैकी कढीलिंबाची पाने तोडून टाकावी. एव्हाना फोडणीचा दाक्षिणात्य वास यायला लागेल, आता त्यात सुंडल पूर्व कडधान्य लोटावे. परतून घ्यावे आणि वरून थोडे मीठ टाकावे. जोवर सुंडल वर छानपैकी ओल्या नारळाचा किस टाकत नाही तोवर त्याचा दाक्षिणात्य पणा सिद्ध होत नाही. :) असे सुंडल छानपैकी कॉफी सोबत संध्याकाळी खायला घ्यावे आणि स्वर्गानुभव घ्यावा. 
हा पदार्थ संध्याकाळच्या एखाद्या झटपट पार्टीत एकदम छान असतो. स्टार्टर म्हणून तर सुंडल नक्की असावे. कडधान्ये पचायला जड असली तरी आपण त्यांना आधी भिजऊन ठेवतो आहोत आणि नंतर छानपैकी फोडणी घालतो आहोत हे महत्वाचे. हिंगामुळे पचनाला मदत होते, तर कढीपत्त्याने पदार्थाची चव वाढते. 
दाक्षिणात्य मंदिरांमध्ये सुंडल प्रसादाकरता तयार करतात. बहुदा शनिवारी व्यंकटेशाच्या मंदिरांमध्ये सुंडल प्रसादाला असतं. पानाच्या द्रोणात सुंडल खातांना त्याची विशेष चव लागते. नवरात्रीत तर ज्या घरी नवरात्री साजरा करतात त्यांच्याकडे ९ ही दिवस संध्याकाळी सुंडल, प्रसाद म्हणून ठेवतात. 
इति श्री स्कन्दपुराणे रेवाखंडे सुंडलोध्याय: संपुर्णम! श्री व्यंकटेशार्पणमस्तु :) 









Comments

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...