Skip to main content

कथा कहे सो कथक !

माणूस मोठा जरी झाला नं, तरी त्याला लहानपणी दिलेले संस्कार आणि अजून काही त्याला  आवडलेल्या गोष्टी कधीच सोडू शकत नाही. बस्स थोडा वेळ मिळावा आणि राहून गेलेल्या आवडत्या गोष्टी, छंद जोपासण्याची संधी मिळावी. आजकालच्या धकाधकीच्या काळात मी छंद जोपासण्याला कोपिंग मेकॅनिसम म्हणते. हल्ली बऱ्याच गोष्टीला मी रिलेट करू शकत नाही. जसे व्हाट्स अँप, फेसबुक, आजूबाजूचे अगदी बदललेले सतत धावणारे जग. लहानपणी हे असे नव्हते, साधे सोपे आणि सरळ होते असं मला वाटतं. तेवढा वेळ पुन्हा मागे जाऊन येणे शक्य नाही हे ही माहिती आहे, पण मनाला तेवढी शांतता देता यावी ह्या उद्देशाने मी कथक शिकायला सुरु केलं. खरंतर अजून ३ वर्षे थांबली असती तर कदाचित कृष्णवी सोबतच शिकता आलं असतं. पण आपण आधी शिकावे म्हणजे तिला जरा सांगता येईल असे वाटले. 
चेन्नई म्हणजे भरतनाट्यम, भरतनाट्यम म्हणजे चेन्नई असं समिकरण वर्षानुवर्षे घट्ट बसलेलं आहे. मार्गळी महिना पूर्ण भरतनाट्यम चे चेन्नईत मोठे प्रोग्रॅम्स होत असतात. म्युसिक अकॅडेमी, नारद गान सभा, कृष्ण गान सभा, मैलापुर फाईन आर्ट्स क्लब, अश्या मोठ्या आणि नामवंत हॉल्स मध्ये मोठे मोठे कलाकार परफॉर्म करत असतात. एकूण चेन्नई म्हणजे तामिळ नाडू ची सांस्कृतिक राजधानीच म्हणता येईल. भरतनाट्यम आणि दाक्षिणात्य संगीत ह्याची आणि माझी काही गट्टी जमेना. भाषा येणे सोपे आहे पण सगळ्या क्लासिकल प्रकाराशी रिलेट करणे मला फार कठीण होते. सा, रे, ग,मं  ला सा, री, गा, मा  म्हणणे म्हणजे फारच कठीण असे वाटे. भरतनाट्यम शिकण्याचे काही विशेष वर्ष असतात. लहानपणी ५-७ वय हे एकदम परफेक्ट असतं. इथे जरीही एका रस्त्यावर २ असे भरतनाट्यम च्या शिकवण्या असल्या तरी माझे मन काही धजेना. 
शोधला तर देवही सापडतो असे म्हणतात. माझं शोधकार्य सुरूच होतं की काय करता येईल? अचानक एक दिवस देवानिया या कथक क्लास चा पत्ता मिळाला. देवानिया च्या फाउंडर, श्रीमती जिज्ञासा गिरी, या चेन्नईत गेल्या १३ वर्षांपासून कथक चे क्लास्सेस घेतायेत. भरतनाट्यम च्या बालेकिल्ल्यात कथक ह्या अतिशय उत्तर भारतीय प्रकाराला शिकवण्याचे काम हातात घ्यायला भारी हिम्मत लागते. ९ मुलींपासून सुरु केलेला हा क्लास आता १७२ विद्यार्थ्यांचा आहे. त्यात वेगवेगळ्या वयाची मुले, वेगवेगळ्या वयाच्या मुली, मध्यवयीन बायका एवढेच नव्हे तर ७२ वर्ष्यांच्या आजी सुद्धा आहेत. 

यथो हस्ता तथो दृष्टी 
यथो दृष्टी तथो मन: ।
यथो मन: तथो भाव: 
यथो भाव: तथो रस:।

या श्लोकाने आमच्या क्लास ची सुरुवात झाली.  
तटकार, चक्कर, झुमर, लडी हळूहळू एकेक प्रकार शिकत पाहता पाहता २. ५ वर्षे झाली आणि वार्षिक कथक महोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला.  ४ - ४ तासाच्या रिहर्सल्स, त्यात कपड्याचे माप देणे, शिवायला टाकणे, वगैरे कामांनी मला एकदम ग्रासले. खरंतर खूप मजाही येत होती. लहानपणी स्टेज वर  परफॉर्म करतांना मावशीच सगळं करून द्यायची. आता सगळे स्वतः करायला लागत होते. कृष्णवी फारच खुश होती. आई स्टेज वर असणार हे तिला खूपच नवीन होतं. करत करत आमची इकडची स्वारीही माझ्या कथक क्लास ला जरा मनावर घायला लागली.  स्टेज रिहर्सल चा दिवस येऊन ठेपला. नेमका मॅरेथॉन च्याच दिवशी माझी स्टेज रिहर्सल होती. कर्म कठीण काम. कारण १० किमी धावून आल्यावर, पुन्हा स्टेज रिहर्सल कशी करणार हा एक खूप मोठा प्रश्न होता. आधीच प्लॅन केल्याने फार त्रास गेला नाही. याकरता माझ्या बुलेट जर्नल ला शतशः धन्यवाद. पुन्हा लिहिनच बुलेट जर्नल बद्दल. 



स्टेज रिहर्सल म्हणजे खूपच छान अनुभव. बऱ्याच गोष्टी आपण किती मिस करत असतो ह्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. कलेची साधना करणे काही सोपी काम नव्हे. जे लोक करतात त्यांना शतशः नमन. कारण आपल्या रोजच्या रागाड्यातून बाहेर येऊन तो जो ऍड्रेनॅलीन रश असतो तो फील करणे काय असते हे मला त्या दिवशी कळले. नारद गान सभा हे खूप उच्च प्रतीचे स्थान आहे, तिथे एम एस सुब्बुलक्ष्मी सारख्या दिग्गज लोकांनी परफॉर्म केले आहे. ती जागा म्हणजे मंदिर असे वाटून गेले. स्टेज रिहर्सल छान पार पडली आता बस्स वाट होती प्रोग्रॅम ची. 


१६ जानेवारी ला प्रोग्रॅम होता, मावशी माझ्या प्रोग्रॅम साठी भंडार्याहून आली. तिनेच माझ्यात हे कथक चं बीज रोवलं होतं. काही खूप मोठे नाही पण थोडेसे काही करता यावे ही इच्छा परमेश्वराने पूर्ण केली. मनमोहना हे आमच्या प्रोग्रॅम चं नाव. अतिशय सुंदर रित्या प्रोग्रॅम पार पडला. मला परफॉर्म करतांना काय वाटले हे अगदी शब्दातीत आहे. 
It was an out of the world experience. 












Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक