Skip to main content

Posts

Showing posts from July, 2009

उत्सव..पावसाचा!

सकाळच्या प्रसन्नतेचा पहिला नैवेद्य घेताना सूर्यनारायण खुष होऊन अजूनच तेजस्वी दिसायला लागले आहेत. ढगांनीही रात्रभर आकाशाच्या अंगणात खेळ खेळून आता निरोप घेतलाय. काही उनाड ढग आहेतच तरी कट्ट्यावर बसलेली टवाळक्या करत.झाडाझाडावरील पक्ष्यांची लगबग सुरू झालीए. आज पावसाने हजेरी नं लावल्याने सगळेच एकंदरीत खुष आहेत. कावळ्याच्या घरात मात्र अजूनही सगळे झोपलेच आहेत. कावळे काकू येऊन दारासमोर रांगोळी टाकून गेल्या. "आज पाऊस का आला नाही? अजून थोड्या वेळ झोपायला मिळालं असतं ना" असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते. नेहमीच घाईत असलेल्या खारुताईंचा मूड मात्र वेगळाच आहे. आज त्यांनी सुट्टी घेतली आहे अर्धी! मुलगी आलीए घरी बाळंतपणाला, तिच्यासाठी घराची डागडुजी करायची आहे म्हणून. नारळे काका काकूंना विचारपूस चाललीए त्यांची घराबाबतीत. नारळेंना तसा या गोष्टींचा बराच अनुभव आहे. कावळे काकूंची मुलगी बाळंत झाली, तेव्हाही ते मदतीला सरसावले होते. शेजारधर्म आजवर त्यांनी अगदॊ चोखपणे पाळलाय. कावळे काकूंचा सल्ला ही बराच मोलाचा ठरतो कारण मोहल्ल्यातील सगळ्य़ांपेक्षा वयाने आणि अनुभवाने त्या मोठ्याच आहेत. खारूताईचा जा

माझे जीवन गाणे..

गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) ) जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं आलो होतो. समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला. एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन

मंगळागौर...(भाग २)

माझ्या मंगळागौरी बद्दल नवर्याचा उत्साह बघुन मला नवलच वाटलं. त्याचं मला सगळीकडे घेऊन जाणं, पार्किंग वगैरे ची कुरबूर नं करता छोट्या छोट्या दुकानात खरेदी करु देणं..बापरे! माझ्यासाठी हे तर एक आश्चर्यच होतं. घरी जाता जाता अगदी अत्यावश्यक गोष्टींसाठी सुद्धा नं थांबणारे आम्ही मंगळागौरी च्या साहित्यासाठी ठायी ठायी थांबलो म्हणजे शिवशंकरानेच कृपा केली म्हणायची ;) सोमवारी शिवामूठ होती. आमच्या ऒफ़िसच्या बाजुलाच शंकराचं भलंमोठं आणि प्रसिध्द मंदीर आहे तिथेच मी जायचं ठरवलं, संध्याकाळी ऒफ़िस झाल्यावर मंदीरात गेले. नेहमी सगळेच म्हणतात की कुठेही जातांना कुणालातरी सोबत घेऊन जात जा.. पण मला मात्र एकटंच फ़िरायला आवडतं..बोलतांना चुका झाल्याशिवाय मजा येत नाही. वाट चुकणे वगैरे सारखे प्रकार झाले नाहीत तर नोर्मल असल्यासारखे वाटत नाही. म्हणुनच मी कुणालाही बरोबर नं घेता मंदीरात गेले. आत गेल्यावर तिकीट खिडकीत बसलेल्या माणसाला सांगितले की मला तांदूळ वहायचे आहेत देवाला कसे वाहू? त्याला राईस म्हणजे काय कळेचना...प्रत्यक्ष दाखवल्यावर तो म्हणाला "अरसी?" ओ हो..सरळ जा आणि उजवीकडे वळ..मी तशी जायला लागले.. उजवीकडॆ

तुझे आहे तुजपाशी...

येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बर्याच वेळा होतं माझ्याबाबतीत. सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो. ऒफ़िसला जायला पावलं घरातून बाहेर पडता पडत नाहीत. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़कत बघ्यासारखं बघणं सुरु असतं अगदी तटस्थपणे. काम खुप असलं तरी करायची तसुभरही इच्छा होत नाही. मग येतो एखादा ओळखीचा फोन आणि होतात गप्पा. "माझा आज मूड ठिक नाहीए गं." नेहमीच्या स्वरात मी सुरु होते. "का? काय झालं मूड ठीक नसायला?" तिकडचा आवाज म्हणतो.. मी सांगते मग माझी सगळी व्यथा अगदी अथ पासून इती पर्यंत. आज बाई आली नाही पासुन, एवढ्या दूर येण्याजाण्याचा आता मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत. आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो. "तुला नं सवय झाली आहे, सगळं चांगलं असतांना चिंतेत रहायची..आजी, आई या सगळयांना लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?" इथपासुन तिकडचा आवाज मला गृहिणींना रोजच किती खपावं लागतं वगैरे सांगतो... मी आपली मान डोलावते. "त्याम

आईचा वाढदिवस!!

रोज पहाटे उठून आई पहिले पोळ्या करायची.भात वरणाचा कुकर लावून आमच्या चहा दुधाची व्यवस्था करायची.तिचा वावर झोपेतही जाणवायचा.तिच्या हातातल्या बांगड्य़ांची किणकीण मनाला मोहून घ्यायची. चहा झाल्यावर लगेच अंघोळीला जाऊन सोहळ्यानिशी देवासाठी पाणी भरायची.मग पूजा चालू होत असे.पुजा करायच्या आधी ओट्यावरच भाजी चिरून पटकन फोडणी घालत असे.मग पूजेत बसली की मला गॅस बंद करायला लावत असे.. ९.३० च्या बस ने सेमिनरी हिल्स हून गांधीबाग ला ऑफिसला जायचे असायचे आणि त्याआधी हा सगळा खटाटॊप. "देवा, आज अशीच पुजा आटपली तुमची" हे तिचे आरती झाल्यावरचे वाक्य आणि कितीही लवकर उठलं तरीही पुजा मात्र घाईतच होते गं मुग्धा असं ती नेहमी मला म्हणत असे. संध्याकाळी घरी आल्यावर थोडावेळ बसून नीट हातपाय धुऊन दिवा लावणे,शुभंकरोती म्हणणे आणि मग स्वयंपाकाला लागणे हा तिचा नित्याचा कार्यक्रम. सणावारी तर तिचा उत्साह आणि मेहनत कळस गाठायची.सगळं साग्रसंगीत झालं पाहिजे हा तिचा सतत आग्रह असायचा.मग काय आषाढी एकादशी,गुरुपौर्णिमा, नागपंचमी, श्रावण सोमवार, गणपती, देवीचं नवरात्र सगळे सण थाटात व्हायचे.आषाढी एकादशीला साबुदाण्याची उसळ, बटाट्याची

मंगळागौर...(भाग १)

"नाही गं येणं नाही होणार माझं मंगळागौरीला..हो इथेच करेन सगळी पुजा व्यवस्थित तू फक्त मला पुस्तक पाठव" असं म्हणून मी फोन ठेवला. मंगळागौर..लग्नं झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी करायची पुजा. पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पुजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून , खेळ खेळून जागरणं करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची ;). लहानपणापासून ऐकत होते, श्रावण सुरू झाला की कोण्या अमुक अमुक ची मंगळागौर झाली वगैरे. मलाही फार इच्छा होती की मस्तं थाटात साजरी करावी पहिली मंगळागौर माहेरी. पण सुट्ट्या आणि आरक्षण या दोन्ही बाबी आड येत असल्याने माझं जाणं होणारच नाही अशी मला खात्री झाली..शेवटी तो माझा सण आहे आणि मला साजरा करायलाच हवा असे मानून मी कंबर कसली.. मला खरंच भारताबाहेर राहणाऱ्यांचं अमाप कौतुक वाटतं.मी भारतातच एका वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या राज्यात राहूनंही मला माझं गाव, तिथली लोकं, बाजारात मिळणाऱ्या गोष्टी इतक्या आठवतात.तर ही सगळी बाहेर राहणारी मंडळी भारताला किती मिस करत असेल ह्य

प्रश्न...!!

काय गम्मत आहे नाही... दिवसापाठोपाठ रात्र..रात्रीपाठोपाठ दिवस.. न थांबता..न संपता... कालचक्र चालतच आहे युगायुगांपासुन.. कधी हीच चाल खुप धीरगंभीर वाटते.. कधी उच्छ्ल जललहरीसारखी... जरा कुठे विसावलं..जरा कुठे थांबलं की आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते पायाखालची वाळू सरकवून.. आपण मात्र चढतच राहतॊ .. बांधत राहतो कोळ्यासारखी घरटी.. नियतीने येऊन निस्तनाबूत करायला.. कधी कधी प्रश्न पडतॊ... तुटण्यासाठीच बांधायचं असतं का घरटं? मरण्यासाठीच जगायचं असतं का? काय गम्मत आहे नाही... दिवसापाठोपाठ रात्र..रात्रीपाठोपाठ दिवस.. न थांबता..न संपता... कालचक्र चालतच आहे युगायुगांपासुन.. कधी हीच चाल खुप धीरगंभीर वाटते.. कधी उच्छ्ल जललहरीसारखी... जरा कुठे विसावलं..जरा कुठे थांबलं की आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते पायाखालची वाळू सरकवून.. आपण मात्र चढतच राहतॊ .. बांधत राहतो कोळ्यासारखी घरटी.. नियतीने येऊन निस्तनाबूत करायला.. कधी कधी प्रश्न पडतॊ... तुटण्यासाठीच बांधायचं असतं का घरटं? मरण्यासाठीच जगायचं असतं का?

मंतरलेले दिवस !!

पुन्हा पाऊस ओला ओला पुन्हा पाऊस बांधुन झुला तिच्याकड्चे ओले थेंब परत करतो माझेच मला... कॊलेज मध्ये असताना असंख्य वेळा ऐकलेली गारवाची कैसेट....अजुनही तितकीच फ़्रेश वाटते. आठवतं रामटेक..सुंदर, निरागस असं.. बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. नागपुर जवळच्या रामटेक नावाच्या गावी. कॊलेज तसं रामटेकच्या बाहेर आहे..एक वेगळ्या वसाहतीसारखं..माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस मी ह्या छोट्या आणि निसर्गसौंदर्याने वेड लावणार्या जागी जगले... आमच्या कावेरी होस्टेल च्या आजुबाजुला किर्र झाडी होती..कैंपस ला जायला त्या गर्द झाडीतुन निघालेले छोटे काळे डांबरी रस्ते..पिवळ्या फुलांचा रस्त्यावर पडलेला सडा...प्रत्येक वळणावर असलेले कलवर्टस.. कैंपसचं खरं सौंदर्य खुलुन यायचं ते पावसाळयात.सागवानाच्या मोठ्ठ्या पानांवर जोरदार पडणार्या पावसाच्या थेंबाचा आवाज काळजाचा ठाव घेऊन जायचा... ही सगळी झाडं अगदी दिमाखात उभी असायची.....एखाद्या वेलीला कडेवर घेऊन....त्यांचा मोहक वेगळाच हिरवा रंग लक्ष वेधुन घ्यायचा..होस्टेलमधुन सरळ बाहेर निघालं की थोड्या अंतरावर लागायच्या आमच्या स्थापत्यशास्त्राच्या विविध विषयांच्या प्र

चलते चलते....

ऑफिसला यायला मला नेहमीच १.५ तास लागतॊ...मनावर कधिमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते .गाडितुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुच्कन उमटतात त्याचे पडसाद... ऑफिसला यायला मला नेहमीच दीड तास लागतॊ...मनावर कधीमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते.गाडीतुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुचकन उमटतात त्याचे पडसाद... मॉन्सुनमुळे असणारं ढगाळ वातावरण, रस्त्यावरची वर्दळ खरोखर मनाला भावुन जाते..नारळाच्या झाडांची सकाळची प्रसन्न चर्या मन सुखावुन जाते. मला प्रत्येक नारळाचं झाड एखाद्या युगपुरुषासारखं वाटतं..सगळ्यांना भरभरुन देणारं आणि काही ही मोबदला नं मागणारं.. ढगाआड असल्यामुळे सूर्यदेवांबद्दल उन्हाळ्यात माझ्या मनात असलेला राग आता कमी झालाय :) त्यांनी असेच राहुन स्वतःचा आणि दुसर्यांचा ताप वाढवु नये असं वाटल्याशिवाय राहत नाही.. रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलातील मोठमोठाले काळे तापलेले तवे, त्याच्यावर पाणि टाकले की येणारा चर्रर्र असा आवाज आणि वाफ़.....वाफ़ ओसरली की तव्यावरुन गोल फिरणारी दोश्या

निळु फ़ुले..

लहानपणी प्राण, प्रेम चोपडा, अमरीश पुरी..यांच्याइतकीच मला निळु फ़ुलेंची भिती वाटायची..त्यांचे हावभाव, डोळे, बोलण्याची लकब सगळेच एका अस्सल खलनायकाप्रमाणे असायचे.. दोन महिन्यापुर्वी सा रे ग म प च्या लिटील चॆम्प्स नी त्यांची घरी जाऊन भेट घेतली..तेव्हा त्यांना पाहीले ते शेवटचेच... त्यांच्या आत्म्याला शांती मिळॊ हीच सदीच्छा..!! लहानपणी प्राण, प्रेम चोपडा, अमरीश पुरी..यांच्याइतकीच मला निळु फ़ुलेंची भिती वाटायची..त्यांचे हावभाव, डोळे, बोलण्याची लकब सगळेच एका अस्सल खलनायकाप्रमाणे असायचे.. दोन महिन्यापुर्वी सा रे ग म प च्या लिटील चॆम्प्स नी त्यांची घरी जाऊन भेट घेतली..तेव्हा त्यांना पाहीले ते शेवटचेच... त्यांच्या आत्म्याला शांती मिळॊ हीच सदीच्छा..!!

मनं माझे...

मनं नाही थार्‍यावर मनं नाही अवाक्यात गुंफ़ियेल्या आठवणी तुझ्या प्रितीच्या मनात ***************** मनं सारखे धावते मनं सारखे हरते मनं आठवुनं तुला कधी हसते रडते.. ***************** मनं अवखळ भारी मनं चोरटे खट्याळ मनं डोळ्यातले पाणी मेघ भरले आभाळ... ***************** मनं पांढरा कागद.. मनं रंगाचा कुंचला मनं रंगते रंगात.. जसे रंगवावे त्याला.. ***************** मनं असे शांत कधी गंभीर ही रागदारी.. मनं कधी असे मुग्ध.. कधी लटके ठुमरी.. ***************** मनाची ही कैक रुपे.. तर्‍हा वेगळीच त्याची थांग त्याचा लावायला. बुद्धी तोकडी मुग्धाची..

संध्याकाळ (देवद्वार छंद)

परतला सूर्य सरला दिवस बदलते कुस संध्याकाळ -------------- पक्षी परतती झाडे ही पेंगती अंधार जगती होतं आला.. -------------- अश्या सांजवेळी लागे हुरहुर माजते काहुर मनामध्ये

देर आए दुरुस्त आए..:)

आज सकाळच्या द हिंदु पेपर च्या पहिल्या पानावरच "loving isnt a crime" हे दर्शविणार्या तरुणाचा फोटो आलाय...आणि खरंच प्रेम करणं हा गुन्हा नव्हेच... समलिंगी संबंधांना मान्यता देऊन हायकोर्टाने मानवी अधिकारांप्रती आपले कर्तव्य चोख बजावले आहे...ह्या निर्णयाने समाजाला घाबरुन वागणार्या गे ,लेस्बिअन, ट्रान्सजेंडर लोकांना आता मोकळेपणाने वावरण्याची संधी दिली आहे. आजवर होत आलेला मानसिक छळ, कुचंबणा, समाजासमोर ही बाब जाहिर झाल्यास काय होईल याची भिती, त्यातुन होणार्या आत्महत्या या सगळ्या समस्यांचं ,ह्या निर्णयानं, थोड्या फ़ार प्रमाणात का होईना..निराकरण होईल असं वाटतंय... आता गरज आहे ती त्यांना आपल्यात मोकळेपणाने वावरु द्यायची... ह्या निर्णयासाठी प्रयत्नशील असणार्या सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन..

जाब!

जीवा पुन्हा धाडधाड करत घराबाहेर निघुन गेला. त्याची आई मात्र एका खुर्चीवर बसुन राहिली.हे त्याचे नेहमीचेच होते. स्वतः वरच राग करायचा, आदळापट करायची, आणि बाहेर निघुन जायचे. आई मात्र काहिही बोलत नसे. तो बोलत असला की तशीच बसुन राही. तो गेला की सर्वशक्तीनिशी कामाला लागत असे. आजमात्र जीवाने बोललेले शब्द जिव्हारी लागले होते... -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ५० वर्षांआधी जेव्हा उमाचे लग्न झाले तेव्हा ती जेमतेम १७ वर्षांची होती..लग्नं होऊन ती अनेक स्वप्ने घेऊन सासरी आली होती.नवरा खुप शिकलेला ,हुशार, एका बॆंकेत नोकरीला होता. स्वभावाने बरा होता. त्याला वाचनाची फ़ार आवड होती..नेहमी तो काही न काहीतरी वाचतच राहत असे. उमाचे नुकतेच खेड्यातुन शहरात स्थलांतर झाले होते. .त्याच्या या वाचनाच्या वेडाबद्दल तिला खुप अप्रुप वाटत असे.त्याच्या मानाने तिची राहणी अगदीच गावंढळ होती.तॊ कुठल्याही लग्नाकार्याला, किंवा कार्यक्रमाला तिला घेऊन जात नसे. पहिल्या वर्षातच उमाला बाळाची चाहुल लागली होती. उमाच्या नवर्याने रीतसर तिला पहील

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा