Skip to main content

आज रामनवमी!

आज रामनवमी! प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस...
या दिवशी खुप छान वाटतं मला नेहमीच. नागपुरला तशी दोन राममंदिरं आहेत. एक रामनगरला आणि एक पोद्दारेश्वर मंदिर ..दोन्हीमंदिरांची शोभायात्रा म्हणजे उत्सुकतेची बाब असते दर राम नवमीला..
लहानपणी आजी मला दर रामनवमीला राम मंदिरात घेऊन जात असे.तिथली सुंदर संगमरवराची मूर्ती लहानपणीच मला खुप आवडायची. मुळात प्रत्येक देवी देवतेच्या मूर्ती पाहुन आपल्या मनात एक विशिष्ट भाव येतात. त्यानुसार मला रामाला पाहुन शांत, प्रसन्नच वाटायचं नेहमी...अश्या वयात जेव्हा शांत प्रसन्न या दोन शब्दांची माझी पुरेशी ओळखंही नव्हती.
पुढे मोठी झाल्यावर नागपूरची शोभायात्रा पहायला जाणे हा नित्याचाच कार्यक्रम असे. आई, बाबा मी आणि छकु सगळेच सोबत रामाच्या दर्शनाला जात असु. आई आपल्यासोबत फुलं, गाठी आणि गुलाल घ्यायची आणि देवाला वहायची...होळीपासुन एक गाठी रामनवमीसाठी आणि एक प्रभु रामचंद्रासाठी असं तिचं ठरलेलं असायचं.
राममंदिरात कितीही गर्दी असली तरी सगळ्यांना शांतपणे दर्शन व्हायचे आणि देवाच्या प्रसन्न मूर्तीला मनात घेऊन आम्ही घरी वापस यायचो..
रामटेकला गेल्यावर माझं आणि प्रभु रामचंद्राचं नातं एका अर्थाने दृढ झालं..नागपूर हुन रामटेकला जातांना थोड्या थोड्या अंतरावर मोठ्या मोठ्या पाट्या लावल्या आहेत..त्यावर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक लिहिले आहेत..महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच ह्या पाट्या उभ्या केल्या आहेत. त्यावेळी नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते..हे श्लोक त्या पाट्यांवर लिहील्याबद्दल मी मनोमन त्यांचे खुप आभार मानायचे...
सुरुवातीला आई बाबांना सोडुन एकटं होस्टेल मध्ये रहायचं मला खुप जीवावर यायचं..मला खुप भिती वाटायची..बस मध्ये बसल्यावर माझं मन आईजवळ्च रहायचं..रामटेकच्या शिवेला गाडी पोचली की हे श्लोक वाचण्यात येत असत..त्यानेही मनावर एका वेगळया प्रकारचा संस्कार घडत असे..
"सामर्थ्य आहे चळवळीचे..जो जे करील तयाचे..परंतु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहीजे"
हा श्लोक मात्र मला नेहमीसाठीच लक्षात राहीला..
रामटेकचं मंदिर भोसल्यांच्या काळातलं आहे.या राम मंदिरात फ़क्तं श्री राम आणि सीता आहेत..लक्ष्मणस्वामींचं मंदिर वेगळं आहे.. मला नेहमी वाटायचं की रामटेकचा राम गोरा राम असावा..पण प्रत्यक्षात तिथली मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.
खरंतर कुठलीही मूर्ती ही माणसानेच घडवलेली असते. देवाची प्रत्येक प्रतिमाही आपण जशी इमैजिन करतो तशीच असते..विष्णुरुप थोडे मोहक, खट्याळ असे..शिवरुप हे भोळे, वेळप्रसंगी विनाशकारी असे..श्रीरामाचे रुप...अतिशय आदर्श मुलगा, पती, राजा असे..तर श्रीकृष्ण रुप मनाला भाबेल असे..हा कदाचित देवाच्या रुपांचा माणसाच्या स्वभावानुसार मी लावलेला निकष असावा पण मला हा मनाला पटतो..तो पटण्यामागे आजी आईने सांगितलेल्या गोष्टी आणि त्यासोबत ख~या जगाची करुन दिलेली ओळख नक्कीच आहे..
केवळ एक गोष्ट म्हणुन मला राम कृष्णांची ओळख करुन दिली असती त्यांनी तर मी ही एक गोष्ट आणि त्यातलं पात्र म्हणुन विसरुन गेले असते.. पण असं नं करता त्यांनी देवाच्या प्रत्येक रुपाशी असलेलं त्यांचं नातं आमच्यासमोर उभं केलं..ते नातं एका व्यक्तीचं देवतेशी असलेलं नातं नं राहता..खर्या जगातलं नातं झालं होतं हे मला आत्ता कळतंय..
आजीला प्रभू राम तिच्या मुलासारखे वाटायचे...ठुमक चलत रामचंद्र म्हणतांना तिचा छोट्या पायांनी चालत असलेला नातू तिला दिसायचा..मोठ्या रामचंद्रात तिला तिचा मोठा झालेला मुलगाच दिसत असावा..अजुनही त्यांच्या वाढदिवसाला स्पेशल भॆटिकरता ती नं चुकता मंदिरात जाते..
आई करता ते मर्यादापुरुषोत्तम होते....त्यांच्या जन्मासाठी आठवणीने गाठी ठेवतांना तिला नक्कीच ते तिच्या खोडकर मुलासारखे वाटत असावेत..
लहानपणी तिने मला शिकवलेला पहीला श्लोक
रामा तुझे कोमल नाम घेता
संतोष वाटे बहुपार चित्ता
बापा दयाळा मज भेट द्यावी
संसार चिंता अवघी हरावी
हा होता..सोपा आणि छान..
मग नंतर जसे जसे संदर्भ येत गेले तसं तसं तिने हिंदू मायथोलोजीतल्या प्रत्येक व्यक्तीची अशीच ओळख करुन दिली..प्रत्येक गोष्टीमागे ती कशासाठी आणी काय शिकवण मिळावी म्हणुन घडली हे तिने कटाक्षाने सांगितलं..
माझ्याकरता प्रभु श्रीराम म्हणजे एक मोठा ठेवा आहेत...आईने सांगितलेल्या गोष्टींची आठवण आणि माझ्या आयुष्यातल्या काही सोनेरी क्षणाची साठवण..
श्रीराम नवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!

Comments

  1. श्रीराम नवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...