Skip to main content

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस




तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे.
तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती. 

कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते. 

मणी रत्नम चे सगळे चित्रपट मला आवडतात कारण म्हणजे प्रत्येक चित्रपटाला एक वेगळी उबदार छटा असते. अगदी आपल्या समोर घडत असलेली गोष्ट आहे असेही बरेचदा वाटून जाते. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिनेमॅटोग्राफी, चित्रीकरण कसे केले आहे यावर चित्रपटाचा फील अवलंबून असतो. बरेचदा कथानक छान असूनही चित्रीकरणात दम नसल्याने चित्रपट तेवढा परिणामकारक वाटत नाही. मणी रत्नम चे सगळे चित्रपट कुठेतरी एक खोल परिणाम करून जातात. 

दलपती ही अश्याच एका तान्ह्या बाळाची गोष्ट ज्याची आई त्याला पिवळ्या फडक्यात गुंडाळून मालगाडीच्या एका डब्यात टाकून देते. त्याचं नाव पुढे सूर्या आणि तो एका छोट्या गावात एक डॉन म्हणून देवराज नावाच्या मोठ्या डॉन च्या हाताखाली काम करत असतो. 

पुढची कहाणी बघण्यासारखी आहे कुंती, अर्जुन आणि कर्ण म्हणजे सूर्या  तिढा दाखवला आहे. कुंतीची घालमेल तिच्या दोन्ही मुलांकरता असलेलं सारखंच प्रेम आणि तिला लहानपणापासून वाटत असणारी गिल्ट आणि तो भेटल्यावर व्यक्त नं करता येणारं प्रेम हे दाखवणं मोठं कठीण काम, पण मणी रत्नम नी एकदम लीलया उभारले आहेत सगळे सीन्स. 

तमिळ चित्रपटसृष्टी तांत्रिक दृष्टींनी अतिशय पुढारलेली होती आणि आहे. १९९१ मध्ये इतकं छान चित्रीकरण करणे, आणि लोकांनी त्याला स्वीकारणे ह्यातच सगळे काही आले. हिंदी डब केलेला दलपती चालला नाही :(

संगीत आणि इलाईराजा:

सिंफनी चा उपयोग इलैराजा यांच्या संगीतात खूप आधीपासून केल्या गेलेला आहे. मला सुरुवातीपासून त्यांचे गाणे खूप कर्णकर्कश वाटायचे. पण हळूहळू त्यांची बरीच गाणी आवडायला लागली. सिम्फनी चा इतका उत्तम उपयोग मी अजूनपर्यंत कुठे पाहिला नाही ते पण प्रादेशिक भाषेच्या चित्रपटामध्ये. 

एस पी बालसुब्रमनियम, जानकी, स्वर्णलता  यांनी म्हंटलेली गाणी दलपती ला एकदम वरच्या स्तरावर नेऊन पोचवतात. 

माझ्या आवडत्या गाण्यामध्ये 

१. राकम्मा कैय्य तट्ट 
२. सुंदरी 
३. यमुना आटरिले ईर काटरिले 

खूपच श्रवणीय गाणी आहेत ही.


 राकम्मा कैय्य तट्ट


अप्रतिम चित्रीकरण, समाजातल्या दोन अतिशय भिन्न गटांमध्ये असलेला विरोधाभास रजनी आणि शोभना यांच्या अभिनयात अगदी दिसून येतो. एका अगदी झोपडपट्टीत राहणारा सूर्या, गावात असलेल्या एका छोट्या प्रोग्रॅम मध्ये कोणत्याश्या पोरीसोबत रात्रभर नाचताना गातांना, तिथेच पहाट झाल्या झाल्या एका उच्चभ्रू घरातील भरतनाट्यम आणि संगीतात प्रवीण असणारी शोभना येतांना रजनी चे हाव भाव सगळं सांगून जातात.
हे गाणं बी बी सी च्या २००२ च्या सर्वे मध्ये सगळ्यात लोकप्रिय गाणं म्हणून नामांकित झालं आहे

मला या बँड चं  व्हर्जन पण आवडतं

https://www.youtube.com/watch?v=-ytwTa44pbY


नेहेमीच खूप काही शिकण्यासारखं आणि आत्मसात करण्यासारखं आहे ह्या चित्रपटात पण. आपली तयारी हवी. चित्रपटासारख्या ताकदीच्या माध्यमातून खूप आधीपासूनच इकडे खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट आले आहेत. पुढच्या भागात कमल हसन, रजनी च्या अवल अपडीदान ह्या चित्रपटावर लिहेन. 













Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक