Skip to main content

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया.
रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते.
तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्नानंतर च्या सुरुवातीला आमच्या घरासमोर मीच रांगोळी घालायची सकाळी उठल्या उठल्या... थोडे वर्षांनी ते बंद झाले कारण फ्लॅट सारख्या घरात शिफ्ट झालो.  त्यानंतर च्या घरात मात्र मी माझी ही  रांगोळी घालायची इच्छा मनमुराद पुरवली.
आमच्या ह्या फ्लॅट च्या समोर पण एक मावशी येऊन सुंदर रांगोळी काढून जातात सकाळी सकाळी.
ही पुली कोलम म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे ७ ते १ असे ठिपके . अपार्टमेंट समोर काढलेली रांगोळी 
दक्षिण भारतात शैव आणि वैष्णव हे दोन भेद आहेत. शैव लोकांकडे वेगळी रांगोळी घातल्या जाते, वैष्णवांकडे वेगळी. शैव ब्राम्हण लोक म्हणजे अय्यर आणि वैष्णव म्हणजे अय्यंगार. आता का आणि कसे हे भेद निर्माण झाले याकरता विश्वरूपम सारखा एखादा चित्रपट बघायला लागेल. पण जास्त करून हा भेद अजूनही लोक पाळतात. खाणे, राहणीमान एकूणच दोन्ही गटात ब्राम्हण असण्याखेरीज काहीच सारखे नसते म्हंटले तरी चालेल. तर... रांगोळी सुध्दा दोन वेगळ्या प्रकारात घातली जाते.
- सिक्कु अथवा पुली कोलम ( ठिपक्यांची रांगोळी)
हा रांगोळीचा अतिशय साधा प्रकार आहे आणि बऱ्याच अय्यर आणि ब्राह्मणेतर समाजात ही रांगोळी काढल्या जाते. ठिपक्यांची रांगोळी लहानपणीपासून मला येते त्यामुळे काही कठीण गेले नाही पण..... आपल्याकडे कसे ठिपके जोडल्या जातात रांगोळीने, इथे सिक्कु किंवा पुली कोलम काढतांना ठिपके वगळल्या जातात.
ही पण ठिपक्यांची रांगोळी 
- पडी कोलम (म्हणजे रेघांनी काढलेली रांगोळी)
पडी कोलम मध्ये मधला चौकोन आधी काढून घेऊन त्याभोवती रांगोळी काढली जाते. मुख्यतः या रांगोळीत कमळ,शंख, चक्र, गदा अश्या वैष्णव संप्रदायात खूप मानल्या जाणाऱ्या खुणांचा वापर केल्या जातो. दारावर पडी कोलम दिसली की समजावे अयंगार घर आहे ;)
शुक्रवारी पुली कोलम काढू नये असे म्हणतात.
अजूनही पूजा वगैरे असली कि चेन्नई आणि बाकी तामिळनाडू मध्ये तांदुळाच्या पिठाला भिजवून, त्या ओल्या पिठाची रांगोळी काढली जाते. मला अजून ते काही जमले नाही. घरांमध्ये देवासमोरही तांदुळाच्या ओल्या पीठानेच रांगोळी काढली जाते. आपल्याकडे अशी एकदम पांढरी रांगोळी सहसा घातल्या जात नाही. अगदी एखादे  बोट लावतोच  कुंकवाचे. इथे मात्र नाही घालत कुंकू. मग मी ही साधीच घालते रांगोळी. कुंकू वगैरे नाही घालत.



रस्त्यावरून चालतांना एका दारावरची रांगोळी

फ्री हॅन्ड पण अयंगार टाईप रांगोळी (अशी रांगोळी माझ्या आजे सासूबाईंकडे काढली जाते) 

आमच्याकडे कामाला येणाऱ्या कामाक्षी ने दिवाळीला काढलेली रांगोळी 

कपालेश्वर मंदिरात नव्या वर्षानिमित्त काढलेली मोठ्ठीजात रांगोळी
पडी कोलम अयंगार स्पेशल, रेघांनी काढलेली रांगोळी 


पडी कोलम 


पडी कोलाम 


पुली कोलम

पुली कोलम 


पुली कोलम




मार्गशीर्ष महिन्यात रांगोळीची स्पर्धा असते. सगळ्या मंदिरांच्या जवळ असलेल्या अग्रहारासमोर (म्हणजे वस्तीत) दोन्हीकडून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. सकाळी म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर (४ -६) या वेळेत. तिरुवल्लीकेंनी, मैलापुर या अनेक मंदिरे असलेल्या भागात तर सकाळी रांगोळ्या बघायला जायची मजा असते.
हे दृश्य मला इतके आवडले,की डोळे मिटताच समोर येते, mychennai च्या फेसबुक पेज वरून साभार. आजूबाजूची घरे म्हणजे देवळासमोर च्या आग्रहाराचा भाग आहे 

एक मामी (इथे लग्न झालेल्या सगळ्या बायकांना मामी संबोधतात) मडीसार (पारंपरिक साडी) मध्ये रांगोळी घालतांना 
रांगोळी आणि तामिळनाडू हे समीकरण अगदी घट्ट आहे. चेन्नई अजूनही आधुनिकतेच्या थोडी दूरच आहे, अजूनही इथे सगळे सण समारंभ अतिशय निगुतीने साजरा केल्या जातात. चेन्नई ची सकाळ म्हणजे सडा, रांगोळी, फिल्टर कॉफी, हातात हिंदू पेपर आणि सुप्रभातम.









Comments

Popular posts from this blog

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...